Panjab Dakh : सध्या महाराष्ट्रातील बहुतांश भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली असून, विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण लक्षणीय आहे. कोकणात अनेक भागांमध्ये नद्यांनी धोका पातळी ओलांडली असून, काही गावांचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
राज्यातील प्रमुख धरणांमध्येही पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी काळात कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.
प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील आज हवामानाचा सविस्तर अंदाज जाहीर केला. त्यांच्या निरीक्षणानुसार, सध्या राज्यातील काही भागांत अतिपावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे, तर काही भागांत अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे हा पाऊस काही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत असला तरी, काहींसाठी त्रासदायकही ठरू शकतो.
Panjab Dakh पंजाबराव डखांचा नवीन हवामान
डख यांच्या अंदाजानुसार, 20 जून 2025 नंतर पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. म्हणजेच राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा प्रभाव कमी होईल. या काळात अनेक भागांत आधीच अतिपावसामुळे पेरणी करणे शक्य झालेले नाही.
ते पुढे म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पेरणी केली नाही, त्यांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यातील पावसाचा फायदा घेऊन पेरणी पूर्ण करावी. विशेषतः 27 जूननंतर एक चांगला पाऊस राज्यात कोसळण्याची शक्यता असून, तो शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, पुढील काळात जोरदार पावसाचा जोर कमी होईल, मात्र काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अधूनमधून पडत राहील. मोठ्या प्रमाणात व सर्वदूर पाऊस मात्र यानंतर दिसून येणार नाही.
तसेच त्यांनी स्पष्ट केले की, 20 जूनपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सरी स्वरूपात कोसळेल, तर जूनच्या अखेरपासून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.